Saturday, June 01, 2019

वळण

भले बुरे जे...घडुन गेले...
विसरुनी जाऊ... सारे क्षणभर...
जरा विसावु...या वळणावर...
या वळणावर....!

लहान पणी केंव्हा तरी... नववी दहावी ला असतांना परीक्षा सम्पल्यावर... सुट्टीचं सकाळी झोपेत.... बाहेर की घरात... रेडिओवर...भले बुरे जे घडून गेले... विसरुनी जाऊ सारे क्षणभर... हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं...!

हळूहळू ते गाणं कानात झिरपत होत नी पडुन रहावस वाटलं... ऐकत... अर्थ पुर्ण कडवे सगळे...सुरेख चाल...! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं...!

खरंच आहे...आयुष्यात किती तरी वळणे येतात... कधी संकटातुन.. वेदनेतुन...कधी आनंदात... हे वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो... किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणं च...! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा... पुढचा प्रवास बदलणारा असतो... हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ...अवकाश...! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर...!

खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जस स्वच्छ उन्हं असतं ना अगदी तसं..!

ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं... मनाला वाटतं की घडामोडिंना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो...... जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणु काही...!

पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते...! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं...! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही... अन हवी असलेली मागची पानं परत वाचताही येत नाही...! ती आपोआप पालटत असतात...! वाचावीच लागतात....! फक्त विसावा काय तेवढा आपला... बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा...!

हे सगळं लिहिताना आणखी एक सुचलेला विचार.  शाळेमध्ये तुम्ही कदाचित 'बँकिंग ऑफ रोड' बद्दल शिकला असाल. ( मूलभूत भौतिकशास्त्र व गणिताचा अभ्यास असल्यास जिज्ञासूंनी हा दुवा पाहावा, http://www.chemistrylearning.com/banking-of-roads/)  वळणावर गाडी उलटू नये म्हणून बाहेरची बाजू जास्त उंच केलेली असते.  तसेच जास्तीत जास्त किती वेगाने वळण घेता येईल असे फलक रस्त्यावर तुम्ही कदाचित पहिले असतील..   आयुष्यातला प्रत्येक निर्णय हे एक वळण मानलं तर असं म्हणता येईल का की एखादा निर्णय घेताना तुम्ही सर्व परिणामांची शक्याशक्यता विचारात घेतली नसेल, किंवा घाईगडबडीत एखादा निर्णय घेतला असेल तर त्याचे पर्यवसान आयुष्याच्या गाडीचा समतोल बिघडवण्यात होणार हे निश्चित.  अर्थात तो कितपत आणि त्यातून तुम्ही सावरू शकाल का हे सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य आणि त्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय आहेत त्यावर अवलंबून असणार!

अर्थात वळण (निर्णय) घेताना ते वळण कितपत धोक्याचे आणि जीवनाच्या दृष्टीने मौलिक आहे हे माहित असेलच असे नाही. त्यामुळे निर्णय घेताना एखादी चूक होतेय ते कळेलच असे नाही, कधी कधी भावनात्मक परिस्थिती असल्याने निर्णय घेतले जात असतात.  (emotions rule over logic) पण फळे मात्र नंतर भोगावी लागतात.

आयुष्यातील हि वळणे घेताना, एखादे वळण हवेहवेसे व नकोसे वाटत असताना, एकाच गतीने उलगडणारा हा प्रवास जगताना मनाच्या गाभाऱ्यात उमटणाऱ्या तरंगांना साक्षी ठेवून...

वळणावळणाचे जीवन
जीवनातील वळणे वळणे
न कुणा कधीही कळली
न कुणा कधी कळणे

वळण असे कधी काटेरी
असह्यपणे घेते चावा
कळू नये असा कधी
काळाचा हा गनिमीकावा

वळण कधी  ते गुलाबी
बेसावध मी येता जाता
गालावरचा तिच्या रक्तिमा
येई हसू आज आठवता

वळण असे भारी अवखळ
येई मजला न सावरता
मला न रुचली अथवा पचली
दिधलिस त्याने जी चंचलता

वळण भासे कधी
मज रेंगाळणारे
कुठली दिशा अन
कुठले वारे

शेवटच्या त्या वळणावरती
ऐकू यावा मोहक पावा
अन माझ्या थकल्या जीवा
मनमुरारी कृष्ण दिसावा

0 Comments:

Post a Comment

<< Home