Sunday, December 29, 2019

इष्टीची खिचडी

सातारला आमच्या घरासमोर अग्निहोत्र होतं. तेथे अहोरात्र होम पेटलेले असत. शास्त्रानुसार घरात अग्निहोत्र असेल तर ते सतत तेवत ठेवाव लागते. घरातील स्त्रीला गावाबाहेर जाता येत नसे. म्हणजे एकदा का लग्न करून मुलगी घरी आली कि तिचं माहेर तुटलंच जणू!  शिवाय अग्निहोत्राचं सोवळं कडक असायचं. अग्निहोत्र करणारे गुरुजी त्या बाबतीत जास्तच कडक होते.  त्यांना गावात खूप मान होता.  त्यांच्या बायकोला  (आजींना) सर्वजण काकू म्हणत.  त्यांचं नाव मला अजूनही माहिती नाही!  त्या माझ्या आजीच्या समवयस्क असाव्यात.  माझे आजोबा संस्कृत पंडीत होते त्यामुळे न शिकताही आजीला संस्कृत उच्चार कुठले स्पष्ट वगैरे कळायचं. दर महिन्यात बहुतेक संकष्टी चतुर्थीला अग्निहोत्र चालायचं.  त्याला इष्टी म्हणायचे.  कदाचित कानडी शब्द असेल कारण त्या नंतर तो मी परत कधी ऐकलेला नाही.  त्यावेळी अनेक भटजी यायचे आणि मोठ्याआवाजात मंत्रोच्चारण करायचे.  सगळं वातावरण कसं भारलेलं असायचं. शाळेत जाताना आठवणीने अग्निकुंडाला नमस्कार करून जा असं आजी सांगायची. नमस्कार केला की गुरुजी थोडं भस्म हातात द्यायचे किंवा कपाळाला लावायचे. कदाचित वयाचा परिणाम असेल पण ते लावलं कि आता आपल्याला कुठलाच आजार होणार नाही, बाधा होणार नाही असा समज दृढ व्हायचा.  त्या दिवशी परीक्षा असेल तर पेपर सोपा जाणार असं उगाचंच वाटायचं (कदाचित थोडे दैववादी असण्याचे दिवस होते!)

होमहवन संपलं कि सगळ्या भटजींना जेवण/अल्पोपहार असायचा.  तो झाला कि त्या समोरच्या काकू पटकन यायच्या, दाराची कडी वाजवायच्या आणि गरम खिचडीच भांड घराबाहेर ठेवायच्या. त्यांच्या सोवळ्यामुळे आम्हाला त्यांच्या हातातून भांड घेता येत नसे. कदाचित कडक सोवळ्यामुळे सावली पडलेलीही चालत नसावी.  त्यामुळे दाराची कडी वाजवून परत जाऊन त्या त्यांच्या घराच्या दारात थांबायच्या आणि मी किंवा आई ने दार उघडलं कि छान हसायच्या.  कदाचित सोवळ्याच्याच भाग असेल किंवा त्यावेळची गडबड असेल पण त्या खिचडी द्यायच्या तेंव्हा कधीच काही बोलायच्या नाहीत. पण त्यांच्या नजरेत खूप प्रेम आणि आर्द्रव असायचं.  मला/ घरातल्याना खिचडी मिळावी म्हणून केलेली धडपड असायची. खूप वर्ष झाली पण त्या खिचडीची चव अजून जिभेवर रेंगाळते आणि वास नाकात घुटमळतो आहे. छान फुललेला साबुदाणा, व्यवस्थित कापलेले बटाटे, अगदी चवीपुरती मिरची आणि वर भरपूर खोबरे आणि कोथिंबीर. अहाहा! काय स्वर्गीय आनंद असायचा..  परत तशी खिचडी खायला कधीच मिळाली नाही. घरी नाही, हॉटेल मध्ये तर नाहीच नाही..   कदाचित त्यांच्या भक्तीचा झालेला पवित्र स्पर्शच त्या खिचडीला ती चव बहाल करत असावा..

मला खिचडी आवडते आणि अजूनही कधीही साबुदाणा खिचडी खाल्ली कि मला त्या काकू आणि त्यांचे अनवाणी पाय, आणि प्रेमळ डोळे आठवतात. केवळ अग्निहोत्राला समर्पित त्यांचं पावन जीवन आठवत आणि का कुणास ठाऊक पण त्यावेळच्या खिचडीच्या आठवणीने डोळे भरायच्या घाईला येतात.