Sunday, March 26, 2017

Sakal article on happiness

सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थानं जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेनं प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयींची, विचारांची धाटणी, जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं रिप्रोग्रॅमिंग असंल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाल्यास आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक सुखाची निरंतर शक्‍यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही सकारात्मक भावना, विचार आणि दृष्टिकोन आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.
या सर्व गोष्टींचा आपण आजच्या लहान आणि तरुण मुलांच्या दृष्टीनं विचार करायला हवा. कारण हीच पिढी येत्या काळात आनंदी आणि समृद्ध समाज असेल. मुळात मला समृद्ध आयुष्य हवंय म्हणजे त्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा, भौतिक गोष्टींची रेलचेल हवी, हा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. खऱ्या अर्थानं समृद्ध आयुष्यासाठी माझ्याकडं सहा गोष्टी असणं गरजेचं आहे.
१) शारीरिक स्वास्थ्य
२) मानसिक स्वास्थ्य
३) माणसांबरोबरच निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी छान नातं
४) पुरेसा पैसा (लालसा कुठे सुरू होते, हे कळणं महत्त्वाचं)
५) कुठल्याही क्षणी आनंदी राहण्याची कला
६) समाधानी वृत्ती
पहिल्या पाच गोष्टी साधल्या, की समाधानी वृत्ती येते. या सहा गोष्टी असल्यास व्यक्तीचं जीवन समृद्ध म्हणता येईल. लहानपणापासूनच व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेत समृद्धी संदर्भातल्या या व्याख्येचा अंतर्भाव असायला हवा.
आज आनंदी समाजनिर्मितीच्या आड समृद्धीच्या चुकीच्या कल्पनांबरोबरच सर्वत्र जाणवणारा वैयक्तिक आणि सार्वत्रिक ताणतणाव हे कारण आहेच. आणि लहानपणापासूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात या दोन्ही मुद्द्यांचा विचार व्हावा. स्पर्धेच्या युगात ताण तणाव अपरिहार्य आहेत. त्याचबरोबर त्यांना तोंड देण्याची क्षमता मुलांमध्ये लहानपणापासून निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यांचा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असंल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास असा व्हायला हवा, की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाचं पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग बऱ्याच अंशी शक्‍य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांचा ‘व्यक्तिमत्त्व विकास’कडं खूप वेगळ्या अर्थानं पाहायला हवं. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्‍चितच नव्हे. या गोष्टींबरोबरच चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनशील बनणं व शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्त्व बनणं हे जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या ‘व्यायामशाळे’साठी निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या व्यायामातून दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची (आउटर जर्नी) तंत्रं, व्यायाम शिकवणारी, तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची (इनर जर्नी) साधना शिकवणारी हवी. म्हणजेच आतलं विश्‍व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्त्व विकास झाला...
या सर्वांची सुरवात महत्त्वाची. ती करावी लागते मुलांच्या व्यक्तिमत्त्व, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधील काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईल फोनच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टीव्हीवर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
बाह्य आणि अंतर्गत समाधान
स्पर्धात्मक जगात यशस्वी व्हायचं असल्यास आउटर व इनर जर्नी या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.
आउटर जर्नी ः आउटर जर्नी म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीनं विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत.
अ) आत्मविश्‍वास, संभाषण कौशल्यं, निर्णयक्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व-प्रयत्नानं या क्षमता मिळवता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. तिला अनुसरून वेगवेगळ्या थेरपी तज्ज्ञ तयार करतात.
ब) आंतरिक क्षमतेच्या विकासासाठी पुढील गुण रुजवायला हवेत.
१) सहानुभूती ः समोरच्याला समजून घेण्याची क्षमता.
२) कल्पकता आणि निर्मितीक्षमता ः कल्पनाशक्ती आणि सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो पाहिजे.
३) उत्कटता आणि तळमळ ः माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र तळमळ हवी.
४) आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं ः नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम हवी.
५) चांगला श्रोता ः समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता विकसित व्हावी.
६) आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता ः तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता हवी.
७) जबाबदारी ः आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता हवी.
८) नेतृत्व ः कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता  हवी.
९) प्रामाणिकपणा आणि मूल्य ः आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहायचा कणखरपणा हवा.
१०) सर्वश्रुतता आणि सावधपणा ः आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे, तर जागतिक सामाजिक घडामोडींविषयी दक्ष असावं.
११) अद्ययावत तंत्रज्ञान ः तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे, ते आत्मसात करायलाच हवं.
१२) स्वयंमूल्यमापन ः स्वतःकडं, स्वतःच्या प्रगतीकडं आणि स्वस्थतेकडं त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं.
आंतरिक स्वास्थ्य महत्त्वाचं
बाहेर यशस्वी होत असतानाच आंतरिक स्वास्थ्याकडं, मन:शांतीकडं होणारा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यशापयशाचा माझ्या मनःशांतीवर काहीही परिणाम होणार नाही; माझ्या मनाचा गाभा नेहमी शांत, स्वस्थ, कणखर आणि आनंदी राहणं यासाठीचे प्रयत्न यामध्ये येतात. एकूणच माझ्या व जगाच्या अस्तित्वाविषयीची जाण, मानवी प्रयत्नांची मर्यादा आणि हातात नसलेल्या गोष्टींचा स्वीकार, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्याचा दृष्टिकोन यात अंतर्भूत आहे. नियमित केलेल्या ध्यानामध्ये मनाच्या डोहात खोलवर जाऊन शांत होत जाणं यात अपेक्षित असतं. ताण तणावाचे खरे स्रोत शोधून तणावाचं व्यवस्थापन करणं. बऱ्याचदा ताण का येतो, याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत-नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो.
तणावाचं मूळ शोधा
दबलेल्या भावना, अपराध गंड, न्यूनगंड, दुर्बल आत्मप्रतिमा इत्यादी गोष्टी या ताणांच्या मुळाशी असू शकतात. त्या तज्ज्ञांच्या साहाय्यानंच दूर करायला हव्यात, अन्यथा हे ताण-तणाव आपल्याला नैराश्‍याच्या गर्तेत ढकलतात. त्याचा आपल्या शरीर व मनावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अनेक मनोकायिक आजार आणि व्याधी जडू शकतात. म्हणूनच तणावाचं व्यवस्थापन लहानपणापासून शिकणं महत्त्वाचं आहे.
 तणाव व्यवस्थापनाचे फायदे
 शारीरिक तब्येत सुधारते. उत्साह, जोम प्रतिकारशक्ती वाढते. भावना स्थिर होतात, नियंत्रणात राहतात. यातून सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन रुजायला मदत होते.
 मन फोकस करण्याची क्षमता वाढते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कामगिरी उत्तम होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद व क्षमता वाढते.
ध्यानधारणा आणि साक्षीभाव 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्राणायाम व ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग होतो. साक्षीभावानं सर्व घटना पाहण्याची सवय मन शांत ठेवते, त्याशिवाय तणाव नियोजन अशक्‍य आहे. एकूणच मनःस्वास्थ्य आणि आनंद कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का, याचं उत्तर होकारार्थी आहे. त्यासाठी आतून स्वस्थ व्हायला हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत आणि कुठल्या नाहीत, हे शांतपणे समजून घ्यायला हवं.
जे टाळणे अशक्‍य दे शक्ती ते सहाया,
जे शक्‍य साध्य आहे निर्धार दे कराया,
मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया !
या प्रार्थनेतील मर्म समजून घेतल्यास बरेच प्रश्न सुटतील.
सर्वांच्याच संदर्भात आपलं ‘आतलं’ जग शांत राहिलं, तरच ‘बाह्य’ जगासाठी आवश्‍यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव (व्यक्तिगत, कौटुंबिक नोकरीतील) सहन करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी साध्य होतील. मानसिक ताकद वाढंल आणि जगण्यातला प्रत्येक क्षणातला आनंद वाढंल. म्हणूनच ‘आतलं’ जग शांत करण्यासाठी आणि आनंदी राहाण्यासाठी रोज काही वेळ ‘स्व’कडं पाहण्याची सवय व्हायला हवी. नवीन पिढीचा योग्य अर्थानं होणारा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचं एकूणच जीवनाविषयी आणि समृद्धीच्या कल्पनेविषयी असणारं वस्तुनिष्ठ भान आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळंच पुढच्या काळातील समाज आनंदी राहील आणि ‘हॅपीनेस इंडेक्‍स’सारख्या तांत्रिक गोष्टींच्या पुढं जाऊन देश खऱ्या अर्थानं समाधानी होईल...

0 Comments:

Post a Comment

<< Home