Monday, January 16, 2017

तिळगुळ घ्या गोड बोला

संक्रांतीनिमित्ताने सुचलेलं लिखाण


आज मकर संक्रांत.  नेहेमीप्रमाणे "तिळगुळ घ्या गोड बोला" अशा शुभेच्छांचा सगळीकडून भडीमार होतोय. पण गोड बोलणं वाटतं तेवढं सोपंही नाही आणि फारसं अवघडही नाही. 
अर्थात गॉड बोलायचं म्हणजे मुहमें राम बगल में छुरी असाही सोयीस्कर अर्थ काहीजण काढतात. राजकारणात तर हाच परवलीचा शब्द असावा असे वाटते.  काहीजण नुसते नावाने गोडबोले असतात पण प्रत्यक्षात मात्र आडनावाला जागत नाहीत (अर्थात हे अपवादानेच)!

काहीजण जन्माला येतात ते जणू तोंडांत साखर पेरली आहे असेच. त्यांचा प्रत्येक शब्द हा गोड वाटतो.
 त्यातलं माझ्या माहितीतील उदाहरण म्हणजे माझी आजी. केवळ गोड बोलण्याच्या जोरावर तिनं कितीतरी माणसं जोडली होती. दूधवाला, रिक्षावाला, भाजीवाला, शेजारीपाजारी सगळे येत जाता ५-१० मिनिटे तिच्याशी बोलत असतं. खूपजण तर फक्त तिच्याशी बोलायला छान वाटतं म्हणून तिच्याशी बोलायला यायचे असे मला आठवते.  मला ही कला काही फारशी साध्य नाही. बऱ्याचवेळा आजी एक संस्कृत सुभाषित म्हणायची "वचने किं दरिद्रता?" अर्थात त्या सुभाषितांचा अर्थ थोडा वेगळा असला तरी गोड बोलण्याची श्रीमंती का सोडा असा ती अन्वयार्थ काढायची. 
मला वाटतं गोड बोलायचं म्हणजे ते वरपांगी होता काम नये. स्पष्टवक्तेपणा असावा पण त्यातही गोडी असली की ऐकणाऱ्याला छान वाटतं.  शिक्षकांनी मुलाला "काय गाढव आहेस!" असं म्हणण्यापेक्षा "तुला अजून नीट कळलेलं दिसत नाही -- परत प्रयत्न कर" असं सांगितलं तर त्याला न्यूनगंड येणार नाही. गोड  बोलण्यात थोडी डिप्लोमसी असावी लागते.  इंग्लिश मध्ये एक कोटेशन आहे "A diplomat is a person who tells you to go to hell in such a way that you look forward to the trip!".
गोड बोलणाऱ्याची बहुतेक काम  मार्गी लागतात. अर्थात त्या बोलण्यात कृत्रिमता नसेल आणि खरे मार्दव्य असेल तरच हे पाहायला मिळते.  मन शुद्ध झालं की वाणी आपॊपाप मधुर होते असे म्हणतात. तर या संक्रांतीला फक्त "गोड बोला" ऐवजी संपूर्ण मनात, आचारा विचारात गोडवा येऊ दे अशी मनापासून शुभेच्छा देतो.  

वाणीत असावा गोडवा
कटू शब्द सदा सोडवा
मन मनास जोडवा
प्रेम शब्दे घडावा
________लेखनसीमा______________




0 Comments:

Post a Comment

<< Home